भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात येणार असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, तत्काळ तिकिटे बुक करताना आता ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. या निर्णयामुळे खऱ्या आणि गरजूंना वेळेवर कन्फर्म तिकीट मिळणे अधिक सोपे होणार आहे.
ई-आधार प्रमाणीकरण का आवश्यक आहे?
रेल्वेच्या माहितीनुसार, दररोज सुमारे 2.25 लाख प्रवासी IRCTC च्या वेबसाइटवरून तत्काळ तिकिटे बुक करतात. मात्र, अनेकदा हे तिकिटे दलालांकडूनच पटकन बुक केल्याचे आढळले आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि बनावट खाते टाळता येतील.
एसी श्रेणीतील तिकीट बुकिंगचे निरीक्षण
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एसी वर्गातील तिकीट बुकिंगसंदर्भात खालील निष्कर्ष समोर आले आहेत:
- पहिल्या मिनिटात: 5,615 तिकीट बुक
- दुसऱ्या मिनिटात: 22,827 तिकीट बुक
- पहिल्या 10 मिनिटांत: एकूण 67,159 तिकीट (62.5%)
उर्वरित 37.5% तिकीट उशिरा बुक झाली आहेत, त्यातील काही तिकीट खिडकी उघडल्यानंतर 10 तासांनंतरही बुक झाल्याचे दिसून आले. यावरून अनेक दलाल विविध बनावट अकाउंटद्वारे बुकिंग करत असल्याचे स्पष्ट होते.
नॉन-एसी श्रेणीतील तिकीट बुकिंगचा अभ्यास
24 मे ते 2 जून या कालावधीत नॉन-एसी वर्गात रोज सरासरी 1,18,567 तिकिटे ऑनलाइन बुक करण्यात आली, त्यातील आकडे पुढीलप्रमाणे आहेत:
- पहिल्या मिनिटात: 4,724 तिकिटे (4%)
- दुसऱ्या मिनिटात: 20,786 तिकिटे (17.5%)
- पहिल्या 10 मिनिटांत: 66.4% तिकिटे
- 1 तासात: 84.02% तिकिटे
या आकडेवारीतून हे दिसते की, बुकिंगसाठी पहिल्या काही मिनिटांचा खूप मोठा फायदा असतो. त्यामुळेच रेल्वेने आधार-सत्यापित खात्यांना या सुरुवातीच्या वेळेत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
बनावट अकाउंट्सवर कारवाई
IRCTC वेबसाइटवर सध्या 13 कोटीहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. मात्र, त्यातील फक्त 1.2 कोटी अकाउंट्सच आधारशी लिंक आहेत. उर्वरित खाती असत्यापित असून, सुमारे 20 लाखांहून अधिक खात्यांवर संशय असून त्यांची चौकशी सुरू आहे.
जर एखाद्याचे IRCTC खाते आधारशी लिंक नसेल किंवा ते बनावट असल्याचा संशय आला, तर असे खाते बंद केले जाईल. यामुळे खरी गरज असलेल्या प्रवाशांनाच तिकीट बुक करता येईल आणि दलालांवर नियंत्रण ठेवता येईल.
तत्काळ बुकिंगमध्ये प्राधान्य मिळणार
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले असेल, त्यांना तत्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांत प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे भविष्यातील प्रवासासाठी नियोजन करत असाल, तर तुमचे खाते लवकरात लवकर आधारशी लिंक करणे गरजेचे आहे.
सूचना: वरील माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत घोषणांवर आधारित आहे. वेळोवेळी यामध्ये बदल होऊ शकतो. खात्रीसाठी अधिकृत IRCTC किंवा भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.